May 30, 2023

अपंग पेन्शन योजना नेमकं काय आहे? अर्ज प्रक्रिया, कागदपत्रं व पात्रतेबाबत घ्या जाणून

महाराष्ट्र अपंग पेन्शन योजना : महाराष्ट्र शासनाने राज्यातील अपंग व्यक्तींना आर्थिक मदत म्हणून महाराष्ट्रात अपंग पेन्शन योजना सुरू केलेली असून या योजनेचा लाभ अपंग लोकांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर राज्यातील अपंग लोकांना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अपंग दिव्यांग पेन्शन योजना राज्यात सुरू करण्यात आलेली आहे.

या योजनेअंतर्गत अर्जदार लाभार्थ्याला राज्य सरकारकडून प्रतिमहा 600 रुपयांची पेन्शन दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याच्या पात्रता, अटी, अर्ज कुठे करावा, आवश्यक कागदपत्रे कोणती हे सर्व प्रश्न तुमच्या मनात उद्भवत असतील, तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आम्ही तुम्हाला देणार आहोत

अपंग पेन्शन योजनेचे लाभ कोणते?

-अपंग पेन्शन योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सरकार अर्जदार लाभार्थ्याला प्रतिमहा 600 रुपयांची पेन्शन देणार असून 80 टक्के अपंगत्व असलेल्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

– तर ही पेन्शन रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल. त्यासाठी अर्जदार लाभार्थ्याचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक असणार आहे.

महाराष्ट्र अपंग योजनेसाठी आवश्यक पात्रता कोणती?

1 अर्ज करणारा अपंग व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे

2 अपंग अर्जदाराचे वय 18 ते 65 वर्षे यादरम्यान असणे आवश्यक आहे.

3 तर अर्जदार अपंग कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 35,000/- रुपयांपेक्षा जास्त नसावे.

4 जर अपंग व्यक्तीला सरकारी नोकरी असेल, तर तो या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असणार नाही

5  या योजनेअंतर्गत 80 टक्के अपंगत्व असलेला व्यक्तीच अर्ज करून लाभ घेऊ शकतो.

अपंग पेन्शन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

– आधार कार्ड, मोबाईल नंबर, अपंगत्वाचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला

–  पासपोर्ट फोटो, ओळखपत्र, वय प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक

अपंग पेन्शन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा व कुठे करावा?

-अपंग पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याला किंवा तहसीलदार किंवा तलाठी कार्यालयाला भेट द्यावी लागेल

– या कार्यालयांमध्ये तुम्हाला अपंग पेन्शन योजनेचा फॉर्म मिळेल

– वरील फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरीत्या भरून नंतर आवश्यक ती कागदपत्रे जोडून ती तुम्हाला जिल्हाधिकारी /तहसीलदार/तलाठी कार्यालयामध्ये जमा करावी लागतील.

-तुमचा फॉर्म या कार्यालयांमध्ये जमा झाल्यानंतर अधिकाऱ्यांकडून तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल.

टीप : वरील योजनेच्या नियमात काही बदल असू शकतो. वाचकांच्या माहितीकरिता हि माहिती देण्यात आली असून या बातमी मध्ये काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी खात्री करून घ्यावी. व त्यानंतरच अर्ज करावा.